Saturday, March 26, 2011

* विवाहाचा गुंता आणि ज्योतिष! *

स्थित्यंतरे म्हणजे जीवन असे म्हटल्यास वावगे होणार नाही. स्थित्यंतर या शब्दात अनेक गोष्टी येतात. माणूस वयाने लहानाचा मोठा होत जातो. हे एक हळूहळू होणारे स्थित्यंतरच होय. या स्थित्यंतराच्या अनुषंगाने व्यक्तीमध्ये महत्त्वाचे असे मानसिक, शारीरिक बदल नैसर्गिकरीत्याच घडत असतात. स्त्री आणि पुरुष यांची शारीरिक, मानसिक, जडणघडण अतिशय भिन्न आहे, आणि वरील स्थित्यंतरात या त्यांच्या घडणावळीत भिन्न अशी त्यांची रूपे किंवा पैलू निदर्शनास येतात.

माणूस म्हणून स्त्री आणि पुरुष एक असले तरी व्यक्ती म्हणून त्या भिन्न प्रकृती आहेत. स्त्री आणि पुरुष हा भेद अनेक अंगांनी साऱ्या जगाला व्यापून राहिला आहे. त्यात स्त्री-पुरुषांचा विवाहसंबंध ही गोष्ट तर जगाच्या मानसशास्त्रावरच परिणाम करते किंवा सध्या तर ती अतिशय नाजूकरीत्या करत आहे.

बहुतांश मानसिक आजार हे स्त्री-पुरुष संबंधांतूनच उद्‌भवत असतात. त्याला कारणे अनेक आहेत. पूर्वी विवाह योग्य वेळी करण्यामागे पालकांचा आग्रह शास्त्रीय व मानसशास्त्राच्या भूमिकेतून अतिशय योग्य असाच असे.

आता काळ बदललाय. जीवनातील तथाकथित स्थैर्याला प्राधान्य देत देत विवाह या अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते किंवा त्याच्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, आणि माणूस नुसता पळत राहतो. ज्या वेळी माणूस विवाहाला उभा राहतो, त्या वेळी आवश्‍यक असलेले सतेज आणि सहज असे तारुण्य अस्तित्वात नसतेच. पूर्वग्रहदूषित, आजूबाजूच्या विकृत संस्कारांतून अवतरलेले, आणि तथाकथित बुद्धिवादातून करपलेल्या तारुण्याच्या प्रभावातच विवाह होत आहेत, आणि समाजाचे मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडत चाललेय.

विवाह मिलन आणि ज्योतिष
प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे विवाह संकल्पनाच बदलत आहेत. ज्योतिषशास्त्रातील विवाह गुणमिलनाचा विचार पूर्वीच्या समाजपद्धतीनुसार मांडला गेला आहे. अर्थात त्याचा पाया काही प्रमाणभूत तत्त्वांवर आधारला आहे. त्याचा योग्य असा आधार घेऊन विवाह ठरवण्यास हरकत नाही, परंतु तसे होत नाही. अतिशय एकांगी प्रकारातून ज्योतिषी हा प्रश्‍न हाताळतात आणि विवाहमिलनामध्ये ज्योतिषी आणखी एक पापग्रह होऊन बसतो.

सध्या विवाहाचे वय प्रचंड वाढलेय. अठ्ठावीस किंवा एकोणतीस वयापर्यंत मुले विवाह करत नाहीत. ज्या वेळी ती विवाहासाठी उभी राहतात त्या वेळी त्यांचे वय एका अशा सीमारेषेवर असते, की जरा विवाहास उशीर झाल्यास ही मुले पुढच्या वयोगटात जाऊन त्यांचा विवाह आणखी लांबतो, आणि योग्य वयोगट न मिळाल्याने विवाहप्रस्तावांची संख्या अतिशय रोडावते.
सध्या माणसे अतिशय चुकीची पद्धत अनुसरत आहेत. आलेले मर्यादित असे विवाहप्रस्ताव पाहण्याचे प्रोग्रॅम न करताच परस्पर पत्रिकेच्या नावावर धुडकारले जातात. मुलामुलींच्या पत्रिकांचे मॅचिंग अतिशय एकांगी दृष्टिकोनातून केले जाते.

खरे पाहायला गेले तर आपल्या नशिबाप्रमाणेच किंवा पत्रिकेनुसारच विवाहप्रस्ताव आपल्या पुढ्यात येत असतात. अशा वेळी बऱ्याच वेळा दैव देते आणि कर्म नेते, असेच घडते.
पत्रिकेतील ग्रहयोगांचा संदर्भ जीवनातील अनेक गोष्टींशी असतो. काही वेळा तो पूर्वजन्माशीही असतो. विवाह ही एकट गोष्ट पत्रिकेतील ग्रह टार्गेट करत नसतात. त्यांना इतरही अनेक उद्योग करायचे असतात. सध्या अल्पसे ज्योतिष ज्ञान असलेल्या व्यक्तीही विवाहमिलनासारख्या महत्त्वाच्या विषयात नाक खुपसत असतात आणि मुलामुलीचा विवाहप्रश्‍न आणखीनच गुंतागुंतीचा करत असतात.

विवाह होण्यासाठी काय कराल?
1) प्रथम आपणास योग्य असलेली विवाहस्थळे प्रत्यक्ष पाहून त्यांचा एक गट करा आणि या गटातूनच पत्रिकेचा आणि व्यवहाराचा ताळमेळ घालून पसंतीक्रम ठरवा.

2) ओळखीच्या स्थळांना अधिक प्राधान्य द्या. मग पत्रिकेचा अट्टहास करू नका! नाहीतर दैव देते आणि कर्म नेते असे होते.

3) मुलामुलींना विशिष्ट असे परस्पर प्रस्ताव आले असतील तर त्याचा संशय न घेता गांभीर्याने विचार करा.

4) तरुण-तरुणींनी ज्योतिष माध्यमाचा पूर्वग्रह ठेवून अजिबात स्थळे बघू नयेत आणि मनोरुग्णता वाढवू नये.

5) ज्या वेळी तरुण-तरुणी ठाम असतील त्या वेळी ज्योतिषी आणि पालक यांनी अजिबात हस्तक्षेप करू नये.

6) महानगरात राहणारे तरुण-तरुणी हा विवाहासाठी वेगळा विषय होऊ शकतो. त्याला ज्योतिषाव्यतिरिक्‍त अनेक संदर्भ येऊ शकतात. तेथे पत्रिकामिलन हा एक फार्स होऊ शकतो. तेथे पत्रिका बघूच नयेत.

7) गुणमिलनाचा आकडा हा म्हणजे काही सर्वस्व नसतो इतके जीवन सरळ, साधे किंवा सोपे झाले असते तर बघायला नको!

Cool बऱ्याच वेळा तरुण-तरुणींचा आतला आवाजच विवाह ठरवतो, आणि त्यांनी आपल्या अंतःस्फूर्तीनुसारच निर्णय घ्यावेत, असे आम्हाला वाटते.

9) अनेक वेळा ज्योतिष्यालाही घोळात घेतले जाते, हे तरुण-तरुणींनी पूर्ण लक्षात ठेवून तारतम्य बाळगून निर्णय घ्यावा.

10) पत्रिका न बघता केलेल्या व्यक्तींचे घटस्फोटांचे प्रमाण अत्यल्प आहे, ही आश्‍चर्याची बाब लक्षात ठेवावी. येथे स्त्री-पुरुषांची सहजप्रवृत्ती किंवा अंतःप्रेरणाच महत्त्वाची ठरली आहे.

विवाहगुणमीलन कोष्टक केवळ चंद्राच्या नक्षत्राच्या गतस्थितीवर अवलंबून असल्याने त्या कोष्टकाच्या आधारे विवाह जमवणे बऱ्याचदा एकांगी ठरू शकते. वधूवरांच्या पत्रिकेतील इतर ग्रहस्थितीचेही मॅचिंग करणे क्रमप्राप्त ठरत असते. चंद्राकडून जसे शडाष्टक योग होतात, तसेच लग्नराशीकडूनही शडाष्टक होत असतात. काही वेळेला वधूवरांच्या पत्रिकेत लग्नाकडूनचे ग्रह त्यांच्या स्वभाव गुणदोषांवर परिणाम करत असतात. वधुवरांच्या पत्रिकेतील स्त्री-पुरुष राशीतील ग्रहांचे मॅचिंग त्यांच्या शारीरिक, मानसिक मिलनावर अनुकुल किंवा प्रतिकूल निश्‍चितच बोलतात. त्यांच्या पत्रिकेतील मनुष्य आणि राक्षसगणी नक्षत्रातील ग्रहांचा समतोल जमणेही आवश्‍यक ठरते. बऱ्याच वेळेस पत्रिका चंद्रराशीकडून जमत नसल्यास इतर ग्रहांचे किंवा लग्नराशींचे मॅचिंग योग्य असल्यास गुणमीलनातील विशिष्ट बेरीज वजाबाकी करून निष्णात ज्योतिषी निर्णय घेतात. ते अतिशय योग्य ठरतात.

एकनाडीचा दोषही वधूवरांच्या पत्रिकेतील विशिष्ट ग्रहांच्या परस्पर संबंधातून निघून जात असतो. हे सर्व बारकाईने बघितल्यासच त्या गुणमिलनात अर्थ राहातो.

Copied from  : http://www.esakal.in/lagnagaath/

No comments:

Post a Comment