Saturday, March 26, 2011

*गोड क्षणांचा आठव...*

"जीवनाच्या वाटेवर घडती अनंत गोष्टी
जीवनसाथी सोबती येता, नातीगोती
मित्रमैत्रिणी हसत खिदळत येती
भावभावनांचे मिलन घडते विवाहवेदीवरती
त्याचे चित्रण केले असता
आठवण होते सखे सोबती!"

बारसं, वाढदिवस, लग्न या सर्व समारंभांत आठवणी जपण्यासाठी आपण आधार घेतो तो फोटोंचा. पूर्वी फोटो काढणं हा एक सोहळा असायचा. आता तो तसा राहिलेला नाही. व्हिडीओ शूटिंगमध्ये जे लाइव्ह दिसतं, ते स्थिर चित्रांच्या माध्यमातून कोण बघणार? म्हणूनच फक्‍त लग्नाच्याच वेळचं नाही, तर एकूणच छायाचित्रण जिवंत हवं, या आग्रहातून विनायक पुराणिक यांनी आपल्या वेगळ्या छायाचित्रणाला सुरुवात केली.

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातला संस्मरणीय असा काळ. उपवर मुलं-मुली तर या क्षणांची आतुरतेने वाट पहात असतात. डिसेंबरपासून लग्नसराईला सुरुवात होते. पण लग्न कधीही असलं तरी त्याची तयारी चार-पाच महिने आधीच सुरू होते. मुला-मुलींबरोबर त्यांच्या कुटुंबीयांची घाई गडबड सुरू होते. लग्नाच्या पत्रिकांपासून हॉल कुठचा घ्यायचा, केटरर्स, सजावट ही जबाबदारी कोणाकडे सोपवायची, यासाठी खटपट सुरू होते. लग्न म्हणजे फक्‍त मंगलाष्टका आणि त्यानंतर नवरा-नवरीवर पडलेल्या अक्षता नसतात, लग्न हा एक कौटुंबिक, सामाजिक सोहळा असतो. प्रत्यक्ष लग्नाच्या मुहूर्ताच्या सहा महिने आधी तो सुरू होतो. आपल्याकडे लग्नाच्या आठवणी जपताना नेमकं हेच विसरलं जातं. लग्नाचे हजारो फोटो असतात, पण ही घाई-गडबड, हे टेन्शन त्यात कुठेही प्रतिबिंबित होत नाही. पुराणिकांनी नेमकं हेच छायाचित्रांत पकडण्याचं ठरवलं आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात केली.

ज्याप्रमाणे चित्रकार आपले चित्र जिवंत करण्यासाठी त्या चित्रात आपल्या भावना ओततो, त्याचप्रमाणे छायाचित्र बोलकं करण्यासाठी त्यात नैसर्गिक हावभावांची भर टाकायला हवी, हे पुराणिकांच्या डोक्‍यात पक्‍कं होतं आणि आहे. म्हणूनच त्यांची फोटोग्राफी ही लग्नाच्या दिवसापुरती नसते, लग्नघरी जायला ते सुरुवात करतात ते लग्नाच्या पंधरा दिवस आधीच. मुलामुलींची आवड-निवड, त्यांचा स्वभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी योग्य आहार, त्वचेची काळजी कशी घ्यावी, या संदर्भात योग्य ते मार्गदर्शनही करतात. छायाचित्रणाच्या दृष्टीने लग्नाचा मंडप अधिक उठावदार कसा दिसेल, त्यासाठी सजावट कशी असावी, रंगसंगती कशी असावी याची माहिती देतात. नवरानवरीने परिधान करायचे कपडे कुठल्या रंगाचे असावेत, की जेणेकरून त्यात त्यांचं व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसेल, हेही ते सुचवतात. मुलामुलींची आवडनिवड जाणून रंगाची निवड करण्यात येते. आपल्याकडे लग्नात नवरानवरीने एकमेकांना घालायचे हार असतात ते लिलीचे किंवा फार तर गुलाबाचे. पण एखादीला ऑर्किड आवडत असेल आणि तिला घालायला ऑर्किडचा हार दिला तर... तिला अनपेक्षित असणारी गोष्ट घडते, ती अधिक सुखावून जाते आणि तिच्या चेहऱ्यावर जे भाव उमटतात त्यांना तोड नाही... लग्न लागताना अंतरपाट धरतात तेव्हा नवरानवरीमध्ये अगदी दोन पावलांचं अंतर असतं. पण अंतरपाटाच्या अलीकडे असताना मुलीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन, तिचे भरून आलेले डोळे अंतरपाट बाजूला केल्यावर मात्र झर्रकन बदलतात... ती पूर्ण त्याचीच होऊन जाते... तिच्या चेहऱ्यावरचे हेच भाव टिपून घ्यायचे असतात...

हे सगळं टिपण्यासाठी पुराणिकांची छायाचित्रकारांची टीम धडपडत असते. सप्तपदीतील सर्व विधी टिपून घेण्याकरता लग्नाच्या वेळी त्यांचे कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त आठ छायाचित्रकार उपस्थित असतात. लग्नाच्या दिवशी मुलाकडे एक, मुलीकडे दुसरा, तर लग्नाच्या हॉलवर तिसरा; अशी त्यांची आखणी करण्यात येते. नैसर्गिक प्रकाशात छायाचित्र काढण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. त्यामुळे लाईटस्‌चा वापर कमी प्रमाणात करण्यात येतो. त्यानंतर तयार करणार येणारा अल्बम अधिक पाहण्याजोगा असतो. बऱ्याच लग्नाच्या अल्बमची सुरवात होते ती लग्नाची पत्रिका लावून. पुराणिक मात्र त्याची सुरुवात कधी कुलस्वामिनीच्या फोटोने, तर कधी मुलीच्या बालपणापासून आजवरच्या फोटोंच्या कोलाजपासून सुरू करतात. अशा प्रकारच्या छायाचित्रांना कमीत कमी 25 हजार तर जास्तीत जास्त लाखापर्यंत पैसे मोजावे लागतात. पण लग्न हा आयुष्यातल्या आठवणींचा ठेवा असतो... त्यासाठी अनेक जण खर्च करायला सहज तयार होतात.

"छायाचित्रणाच्या संकल्पनेत इतके आमूलाग्र बदल झाले असले तरी छायाचित्रणाला व्यावसायिकदृष्ट्या कोणीच पाहात नाही. आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण टिपून घेऊन त्यांचं जतन करून ठेवणाऱ्या छायाचित्र कलेला अभ्यासात समाविष्ट करून घेण्याची गरज आहे. तरच छायाचित्रणाला अधिक महत्त्व प्राप्त होईल,' पुराणिक सांगतात. या कलेचं महत्त्व सांगण्यासाठी आणि अशा प्रकारचं छायाचित्रण कसं केलं जातं हे शिकवण्यासाठी पुराणिक मार्गदर्शक वर्गही चालवतात.

Copied from  : http://www.esakal.in/lagnagaath/

No comments:

Post a Comment