Sunday, March 27, 2011

* हवे सखोल आत्मपरीक्षण *

 स्थळं बघताना अनेक शक्‍यता आपल्यासमोर येत असतात. अनेक पर्याय उपलब्ध असतात. एखाद्या स्थळाच्या काही गोष्टी उजव्या; तर काही खटकणाऱ्या असतात. अशा वेळी वरचढ गोष्टी मान्य करताना खटकणाऱ्या गोष्टींशी तडजोड करायचा सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ "मुलाचं बाकी सगळं चांगलं आहे, फक्त दोन धाकट्या बहिणींच्या लग्नाची जबाबदारी आहे' अशा वेळी, "होऊन जाईल. एकदा लग्न होऊन बहिणी गेल्या, की तुम्हीच दोघं राजा-राणी' असा सल्ला देताना बहिणींच्या लग्नाची जबाबदारी पार पाडेस्तोवर "राजा-राणी'सारखं राहायचं वय निघून जाईल, तेव्हा मारलेल्या मनाला त्याचे नंतर काहीच कौतुक वाटणार नाही आणि लग्न करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने याला किती महत्त्व आहे. या "गेलेल्या संधीशी' तडजोड करण्याची तिची तयारी आहे का? हे विचारात घ्यायला हवे.

दोन बहिणींच्या लग्नाची जबाबदारी याचा अर्थ कदाचित दोघांनी नोकरी करून पैसा जमवणं असाच जरी नसला, तरी नवरा काटकसरीने पैसे जमवायचा प्रयत्न करेल एवढा तर निश्‍चित असतो. कदाचित हनीमून कट, सुरुवातीच्या नव्या नवलाईच्या, "रोमान्स'च्या दिवसांतली हौसमौज कट, हॉटेलिंग, सिनेमा, फिरणं इ.कट! अगदी साधं उदाहरण म्हणजे घरून किती फोन करायचे किंवा लक्ष देऊन खोलीत कोणी नसताना विजेचे बटण बंद करणेसुद्धा!

या सगळ्यासाठी लग्न करणाऱ्या व्यक्तीची मानसिक भावनिक तयारी झाली आहे का? की तिला हा कोंडमारा वाटतोय? ही तडजोड असली तरी ती मनापासून मान्य केली जातेय, का केवळ आईवडील सांगतायत म्हणून? की केवळ आता लग्नाला आणखी उशीर झाला तर कदाचित यापेक्षा चांगले स्थळ मिळणार नाही म्हणून आहे ते स्थळ हातचे घालविण्यापेक्षा लग्नच न होण्याची "सामाजिक नामुष्की' टाळण्यासाठी होकार दिला आहे? हे पुढच्या संसाराच्या, सहजीवनाच्या दृष्टीने फार कळीचे मुद्दे ठरतात. नाइलाजाने दिलेला होकार आणि पूर्ण समजून उमजून, तडजोडीची मानसिक तयारी करून दिलेला होकार यात जमीन-अस्मानाचे अंतर असते.

दुसऱ्या उदाहरणाचा विचार केला तर कित्येक वेळा नोकरी करणारी मुलगी त्यातही उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, भरपूर पगार असलेली, बॅंकिंग क्षेत्रातली चटकन पसंत पडते, पण त्याबरोबरच्या कामाच्या अनियमित वेळा, वर्ष संपण्याच्या वेळी करावे लागणारे जास्तीचे काम, पैशांच्या हिशोबाची जबाबदारी व त्याचे मानसिक ताणतणाव या गोष्टी अशा स्थळाला होकार देताना विचारात घ्यायला हव्यात.

(इथे असा नवराही भरपूर कमावणारा हवा असेल तरीही या शक्‍यता आहेतच. त्यामुळे आमचे हे कधीच घरी नसतात. मुलांच्या शाळेत, सणसमारंभ यासाठी ते कधीच येत नाहीत, याविषयी नंतर त्रागा करण्यात अर्थ नाही.)

स्त्रीच्या बाबतीत तर वेगळ्याच शक्‍यता आहेत. तिला बायको म्हणून स्वीकारताना पत्नीला ऑफिसमधून यायला उशीर होणार असेल तर किमान डाळभाताचा कुकर लावायची आपली तयारी आहे का? तिही नसेल तर बाहेरूनच जेवणाचा डबा मागवायची तयारी आहे का? नुसता डबा मागवून काम भागत नाही, तर पत्नीला उशीर झाला तरी चिडचिड न करता तिचे हसतमुखाने स्वागत करता येईल का? आपल्याला कामांमुळे उशीर झाला, कामाच्या जबाबदारीच्या तणावाखाली आपण दमून आलो, तर आपल्याला घरात ज्या शांततेची, समजून घेण्याची अपेक्षा असते तेच वातावरण आपण पत्नीसाठी घरात निर्माण करू शकू का? की आपली चिडचीडच होईल? की पत्नीने दमून आल्यावरही सारे घरकाम आटोपलेच पाहिजे, अशीच आपली अपेक्षा असेल? कारण आपल्या घरात स्वैपाकघरात पुरुष काम करीत नाहीत. की पत्नीने सकाळीच दोन्ही वेळचा स्वयंपाक करून जावा अशी आपली अपेक्षा असेल? मग त्या अपेक्षेबरोबर पूर्वतयारीसाठी तिला मदत करायची, भाजी निवडून वा चिरून द्यायची आपली तयारी असेल? की त्यासाठी मदतनीस असेल? आणि हे सारे सारे जरी असेल तरीदेखील तिच्या कामाच्या जबाबदाऱ्या लक्षात घेता घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवणे आपल्याला जमेल?

त्याहीपुढे जाऊन मुलाबाळांचे अभ्यास, क्‍लासेस, आजारपणे व इतर दिनक्रम सांभाळण्याची जबाबदारी एकट्याने घेणे, कामामुळे काही घरगुती समारंभच करता न येणे किंवा अशा समारंभांना पत्नी हजर राहू न शकणे हे आपल्याला समजून घेता येईल का? की त्यात कमीपणा वाटेल? आपले विचार, कल्पना जरी आधुनिक असल्या, तरी आपले कुटुंबीय, नातेवाईक ते मान्य करून आपले व आपल्या पत्नीचे पर्यायाने आपल्या कुटुंबाचे वेगळेपण मान्य करतील का? की कालांतराने शेवटी त्यांच्या तक्रारींचे आपल्या संसारावर अनिष्ट परिणाम होतील? की आपलीही मानसिक तणावाची नोकरी असल्याने शक्‍यतो असे स्थळच नको?

एक ना दोन! एका मुद्द्यावरून इतके प्रश्‍न उभे राहतात आणि आत्मपरीक्षण इतक्‍या गहन व खोल पातळीवर जाऊन पोचते, पण आयुष्यभर नाइलाजाने संसाराचा गाडा रेटण्यापेक्षा प्रत्येक पर्यायानुसार आधीच सखोल आत्मपरीक्षण केलेले बरे, नाही का?

Copied from  : http://www.esakal.in/lagnagaath/

No comments:

Post a Comment