Saturday, March 26, 2011

*घरात वाजंत्री वाजते*

""काय? झालात ना नोकरीत पर्मनंट? मग केव्हा उडवताय बार?''

""अहो काका, नुसतं पर्मनंट होणं पुरेसं आहे का? थोडं सेव्हिंग झालं पाहिजे, राहण्याची अधिक चांगली सोय व्हायला हवी. नुसती नोकरी कायम झाली म्हणून लग्नाची घाई करण्यात काही अर्थ नाही.''

""अग शिल्पा, शिक्षण झालं ना पूर्ण तुझ्या लेकीचं. मग आता बघायला लागणार की नाही? वयाचा विचार पण नको का करायला?''

""हो, ते आहेच गं; पण एवढं शिकल्यासारखं नोकरी करून आधी स्वतःच्या पायावर उभी राहणार म्हणते आहे ती. आता या नवीन पिढीचं काय सगळेच विचार वेगळे. आपलं ऐकतात का ते?''

अगदी आपल्याच किंवा फार तर शेजारच्या घरातले वाटत आहेत ना हे संवाद? मुलगा, मुलगी "तथाकथित' लग्नाच्या वयाचे झाले, की त्यांच्याही आधी घरातले, नातेवाईक, परिचित, शेजारीपाजारी अशा सगळ्यांच्या मनात त्यांच्या लग्नाची वाजंत्री वाजायला लागते! मुलाचं, मुलीचं (समाजमान्य असं!) लग्नाचं वय, शिक्षण संपून नोकरी मिळणं (व ती कायम होणं!) थोडी बचत गाठीशी जमणं, राहण्याची सोय असणं... थोडक्‍यात स्थिरस्थावर झालेला मुलगा आणि मिळवती किंवा मिळकतीला सक्षम झालेली शिक्षित मुलगी हेच आजही मुलगा किंवा मुलगी लग्ना"योग्य' (विवाहेच्छू!) बनल्याचे निकष आहेत- पालकांच्या मनातले, त्यांच्या बहुतांशी नातेवाईक वा परिचितांच्या मनातले!

विवाहेच्छुक मुलामुलींचे पालक म्हणून आपल्यालाही हे आणि एवढेच निकष योग्य वाटतात? बदलत्या काळानुसार या निकषांमध्ये काही भर पडली पाहिजे असं आपल्याला नाही वाटत?
""आम्ही स्थळं बघायला सुरवात करण्यापूर्वी आधी विचारून घेतलं, "तुझ्या मनात कुणी नाही ना?' मगच सुरवात केली. "तुझ्या काय अपेक्षा आहेत त्याही मोकळेपणानं सांग,' म्हटलं.'
काळानुरूप आपण केवढे बदललो आहोत असं मनापासून वाटणाऱ्या एका उपवर व्यक्तीच्या आईनं मला कौतुकानं सांगितलं होतं! पण आपल्या विचारांचा बदलाचा वेग काळ ज्या झपाट्यानं बदलत आहे त्या वेगाशी सुसंगत आहे का, हा विचार त्यांच्या मनातही आला नव्हता.

वर उल्लेखलेल्या निकषांनुसार मुलगा-मुलगी "लग्नायोग्य' झाली असली, तरी जोडीदार बनायला ते "लायक' झाले आहेत का, हा प्रश्‍न पालक म्हणून आपल्या मनात डोकावतही नाही!
एक चांगला-लायक जोडीदार बनणं ही आता काळाची गरज झाली आहे आणि याची दखल घेणं ही आपली गरज! सन 1990 नंतर परिस्थिती झपाट्यानं बदलत गेली.

जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण हे शब्द परवलीचे बनले. यामुळे वेगानं बदलणाऱ्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचे पडसाद आपल्या जीवनावर उमटल्याशिवाय कसे राहणार होते? एव्हाना मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढलेलंच होतं. आर्थिक स्वावलंबनाच्या विचारानं त्या हळूहळू मिळवत्याही होऊ लागल्या होत्या; पण आता तर त्यांची नोकरी ही अनेक कुटुंबांची गरज बनली! वाढती महागाई, वाढत्या आर्थिक गरजा, जागेची निकड व त्याचे मासिक हप्ते, नोकरी मिळण्यातली व मिळाली तर टिकण्यातली अशाश्‍वती, व्यवसायातील अस्थैर्य, घरातील जबाबदाऱ्या... अशा एक ना अनेक गोष्टींमुळे "दुहेरी उत्पन्ना'ची गरज घराघरांतून जाणवू लागली. स्वाभाविकपणे वधू कशी हवी याचेही निकष बदलले; पण वराच्या निकषांच्या बदलांची दखल घ्यायला मात्र कुणीच तयार नाही!

वाजंत्री लवकर वाजण्याचा आग्रह धरणारं हे उदाहरण तर पाहा! कॉलेजच्या सुरवातीच्या दिवसांतच ट्रेकिंगच्या ग्रुपमध्ये भेटलेल्या दोघांनी कालांतरानं एकमेकांशी लग्न करायचं ठरवलं; पण दोघांचंही सर्व शिक्षण व्हायचं होतं. मुलानं पदवी शिक्षणानंतर एमबीए करायचं ठरवलं. लग्न लांबलं. मग शिक्षण पूर्ण झालं; पण त्याला नोकरी पटकन मिळेना. मुलगा-मुलगी बरीच वर्षं एकत्र फिरत असल्यानं आता पालकांना दम निघेना!

नोकरीशिवाय लग्नाची जबाबदारी घेणं मुला-मुलीला सोयीचं वाटेना. त्यात मुलाचा भाऊ एक महिन्यासाठी अमेरिकेहून आलेला व पुढं इतक्‍यात भारतात येण्याची शक्‍यता नसलेला! त्यामुळे त्याच्या मुक्कामात लग्न व्हावं हा वाढीव दबाव! सुदैवानं भावी वधू-वरांना सोयीचं वाटेपर्यंत थांबण्यासाठी मुलाची आई ठाम राहिली!

अशा अनेक गोष्टींचा विचार आज व्हायला हवा आहे. मुला-मुलींच्या लग्नात कुटुंब व समाज हेच घटक आजही प्रभावी आहेत; परंतु लग्नाच्या केंद्रस्थानी आता ही विवाहेच्छू मुलं-मुली राहतील हे पालकांनी बघायला हवं. विवाहेच्छुक मुला-मुलींनी आधी विवाहयोग्य बनायला हवं. त्यासाठी ओळख हवी स्वतःची स्वतःशी.

मी कसा/कशी आहे याचं परखड आत्मपरिक्षण व्हायला पाहिजे. माझे गुण, दोष, व्यक्तिमत्त्वातील खास विशेष, माझ्या आवडीनिवडी, माझे प्राधान्यक्रम, आयुष्य जगण्याविषयीच्या कल्पना, भविष्याच्या योजना, मी काय स्वीकारू शकते/शकतो, काय मला नक्की हवं नि काय नक्की नको, माझा तडजोडीचा प्रवेश (area) कोणता, तिथं मी कुठवर तडजोड करू शकते/ शकतो, कशा प्रकारची जीवनशैली मला सुखकारक वाटते, संसार आणि करिअर याचा तोल मी कसा साधणार, वैवाहिक आयुष्याकडून माझ्या अपेक्षा काय, जोडीदाराकडून कशा प्रकारचं वैवाहिक नातं मला अपेक्षित आहे... असे अनेकानेक प्रश्‍न मुलामुलींनी स्वतःला विचारलं पाहिजे. एक प्रकारे हा त्यांचा "स्वअभ्यास'च असेल.

शाळा-कॉलेजमध्ये "अभ्यास कर' म्हणून सतत मुलामुलींच्या मागं लागणाऱ्या पालकांनी आता या स्वअभ्यासाची जाणीव मुलांना करून द्यायला हवी. त्यासाठी त्यांना मार्गदर्शन व उत्तेजन द्यायला हवं. मुळात हे विचार त्यांच्यात रुजवायला हवेत.

पूर्वी आठ-आठ दिवस लग्न चालायची. अनेक वयाची, नात्याची, अनुभवाची नातेवाईक मंडळी एकत्र जमायची. या मंडळींच्या सहज सल्ल्यांतून, अनुभवांच्या बोलातून, इतकंच काय उखाणे, गाणी आणि थट्टामस्करीतूनही भावी वधू-वरांना खूप "टिप्स' मिळून जायच्या. शेतीप्रधान एकत्र कुटुंबात सर्व प्रकारची माणसं सामावलीही जायची. तडजोड करण्याची सहज प्रवृत्ती असायची. आता मात्र घरातील कौटुंबिक व बाहेरची सामाजिक परिस्थिती खूपच बदलली आहे याचं भान ठेवून, पालकांनी या बदलत्या 'ट्रेंड' (trends) बद्दल मुलामुलींशी बोलायला हवं. लग्नाला कुणाला बोलवायचं नि खरेदी काय नि कोठे करायची, मेनू काय ठेवायचा यापेक्षा या अशा गोष्टी कुटुंबात बोलल्या जाणं कितीतरी अधिक गरजेचं आहे.

"नोकरी करणारी मुलगी हवी' असं म्हणणाऱ्या मुलाला त्याच्या पालकांनी "मग तुलाही घरकामात तिला सहकार्य करावं लागेल,' असं सांगितलेलं असत?

मोठ्या शहरात वाढलेल्या एका मुलाला शिक्षण संपल्यावर गावी जाऊन शेती करण्यात रस निर्माण झाला. प्रत्यक्ष तिथं राहून काम करायला लागल्यावर तो तिथंच रमला. त्याच्याच प्रमाणे शेतीत रस घेणारी, त्या आडगावातील घरात राहायला तयार असलेली मुलगी आता त्याला सहचरी म्हणून हवी आहे! पण शिकलेली!! अशा शिकलेल्या मुली तिथं जायला तयार नाहीत आणि त्या मुलाचं लग्न काही जमत नाही. ज्या वेळी त्यानं तिथं जाऊन राहण्याचा विचार बोलून दाखवला त्याच वेळी या निर्णयाची ही दुसरी बाजू नि त्यानुसारच मिळणारा प्रतिसाद याची कल्पना पालकांनी त्याला दिली असती, तर त्याचा फायदा नसता का झाला?

आमच्या माहितीतील एक लग्न नुकतंच मोडलं नि त्याला कारणीभूत झाले मुलाचे आईवडील! मुला-मुलीचं पटण्यात काही अडसर नव्हता; पण पण सासू-सुनेचं मुळीच जमेना.

"आपण वेगळे राहू' एवढंच तिचं म्हणणं होतं, जे मुलाला मान्य नव्हतं. त्यासाठी त्यानं घटस्फोटाचा पर्याय स्वीकारला! घरात वाजलेल्या सनईचे सूर असे बेसूर होणं पालक टाळू शकले नसते का?
अनुभवी पालकांचा सल्ला, मार्गदर्शन मोलाचं असतं असं आपण अनेकदा म्हणतो; पण स्वतःच्या, इतरांच्या संसाराचा अनुभव असूनही त्याचा ना प्रत्यक्ष विचार पालक करताना दिसतात ना मुलांशी हे मोकळेपणानं बोलताना दिसतात. नुसतीच वाजंत्री वाजायची घाई!

लग्न हे नुसतं करायचं नसतं तर ते निभावून न्यायचं असते. तडजोड करण्याची प्रवृत्ती कमी-कमी होत चाललेल्या आजच्या तरुण पिढीला हे निभावून नेणं दिवसेंदिवस अवघड बनत चाललं आहे.

वाढत्या घटस्फोटांची संख्या दुसरं काय सांगते आहे? पन्नास-एक वर्षांचा सहजीवनाचा पट सुखद, सुरेल करायचा तर बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा सक्षम जोडीदार बनायला हवं. त्यासाठी हे बदल डोळसपणे टिपायला हवेत. ते आपल्यात असण्यासाठी स्वतःची खूप मानसिक तयारी करायला हवी न्‌ पालकांनी या बदलत्या परिस्थितीची दखल घेऊन मुलामुलींना या तयारीसाठी मदत करायला हवी. येणाऱ्या नवीन सून/जावयासाठी घरसुद्धा तयार व्हायला हवं!
नाही तर आधी सनई "केव्हा' वाजणार याची घाई नि मग "का' वाजली, असं म्हणायची पाळी!!

Copied from  : http://www.esakal.in/lagnagaath/

No comments:

Post a Comment